Monday, August 3, 2009

पण शब्द उमटतच नाहीत...

वयाबरोबर पदाने, अधिकाराने मोठे होताना बालवर्गातल्या मित्राची अडगळ होऊ लागते. आपल्या मित्रमैत्रिणींच्या नवीन कं
पूमध्ये त्याला आपण टाळूही लागतो. पदाभोवती जमलेल्या 'मतलबी गर्दी'ला मित्रांच्या यादीत घालून आपण मोकळे होतो आणि तो आपल्याला असूनही नसल्यासारखा होतो!
.....

आईचा हात धरून बालवर्गात जाताना कधीतरी तो भेटलेला असतो. हट्टाने शेजारी बसत 'आपल्या तुपल्यातल्या' गोष्टी कानांत सांगता सांगता कधी माऱ्यामाऱ्याही झालेल्या असतात. युनिफॉर्मची बटणं तोडून घरात आल्यावर रुसक्या चेहऱ्याने आईकडे तक्रार करताना ती मिश्किलपणे म्हणते, 'मग नको ना बोलूस त्याच्याशी. एकदम कट्टी घेऊन टाक!' 'हो हो...कट्टीच घेणार. एकदम पक्की', असं आपण म्हणतो खरं, पण त्यात काही दम नसतो. दुसऱ्या दिवशी शाळेच्या गेटवर एका हातात चॉकलेट आणि दुसऱ्या हाताची दोन बोटं समोर धरत गोड हसत तो म्हणतो, 'बट्टी?' मग कालची कट्टी चॉकलेटमध्ये विरघळून जाते... सोपं होतं सगळं.

वयाचे आकडे वाढत जातात. आपण जास्त मोठे होतो. वयाबरोबर पदाने, अधिकारानेही. मित्रांच्या यादीतले चेहरे बदलत जातात. तुमच्या पदाभोवती, खुचीर्भोवती जमलेल्या मतलबी गदीर्ला मित्रांच्या यादीत घालून आपण मोकळे होतो. ते सोयीचं असतं, फायद्याचंही. या कंपूबरोबरचं गॉसिप हेच आपलं शेअरिंग होतं. तो शाळकरी दोस्त

स्टँडर्ड आणि पोझिशनच्या हिशेबात तुमच्या जवळपासही पोहोचत नाही,

पण त्याचा जीव असतो तुमच्यात. तुमच्या साध्या साध्या अचिवमेंटचं कौतुक असतं त्याला. प्रत्येकवेळी फोन करून तो भरभरून बोलतो . तुमच्या वाढदिवसाला आठवणीनं फुलं घेऊन घरी येतो तेव्हा रंगलेल्या पाटीर्त 'हा कसा उपटला मध्येच?' या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत तो मनापासून विश करत न जेवताच निघून जातो. तुम्ही त्याला थांबवत नाही. त्याची आता अडगळ होऊ लागलेली असते. त्याचे फोन आले की, थातूर मातूर बोलून त्याला टाळू लागतो. नंतर त्याचा नंबर डिस्प्ले झाला तरी, तुमचा चेहरा आक्रसू लागतो. फोन आपोआप सायलेंट मोडवर जातो. तुमचं वेल फनिर्श्ड घर आणि ब्रँड न्यू कारसमोर बुशशर्ट पँट घातलेला आणि चाळीतून बायकोने दिलेला डबा घेऊन लोकलला लटकत ऑफिस गाठणारा तो, पार बेंगरुळ वाटू लागतो. हृदयातून काही उमटतच नाही. यशाची शिडी पार करताना दोघांतलं अंतर आणखी वाढत जातं. तुमचं टाळणं त्याच्याही लक्षात येतं. तुमच्या धावपळीमुळे नसेल जमत म्हणत तो तुम्हाला माफ करतो. त्याचे फोन बंद होतात, तुम्ही सुस्कारता...

आयुष्याच्याही पुढे धावता धावता खूप कॅलक्युलेटेड असलेले तुम्ही एखाद्या क्षणी हमखास चुकता. ठरवलेली गणितं सपशेल कोसळतात. सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. तुमचं पद, पैसा आणि वलयाभोवती जमलेली गदीर् हळुहळू पांगू लागते. रंगवलेल्या मुखवट्यांमागचे खरे चेहरे उघडे पडू लागतात. आपली म्हणवणारी नात्याची माणसंही टाळू लागतात...

निराशेनं भरलेल्या एखाद्या संध्याकाळी एकटेपणावर रेघोट्या ओढताना अचानक बेल वाजते. दारात तो उभा असतो. छानसं हसू ओठांवर आणत आश्वासक डोळ्यांनी तो तुमच्या नजरेत नजर मिसळतो. सहज बोलावं तशा सुरात तो म्हणतो, 'अरे इकडून जात होतो, म्हटलं तू आहेस का बघावं.' आपले शब्द ओठांतच अडकतात. 'हडकलास रे. केवढी धावपळ करतोस. वय झालं आपलं. जरा स्वत:कडे लक्ष द्यायला शिक साल्या', तोच बोलतो. अनेक वर्षांनी हे ओळखीचं 'साल्या' ऐकून तुमचं अपराधीपण कोणत्याही क्षणी डोळ्यांतून ओघळणार असतं. पण तुमच्यातला कॅलक्युलेटेड माणूस त्याच क्षणी जागा होतो. 'तू तरी कुठे फोन केलास इतक्या दिवसांत?', तुम्ही विचारता. त्याचा चेहरा बदलतो. पण क्षणभरच. अपराधी स्वरांत तो म्हणतो, 'सॉरी. चुकलं. राहूनच गेलं रे!' तो हात पुढे करतो. आज त्याच्या हातात चॉकलेट नसतं पण, हातात दिलेला हात घट्ट धरून ठेवत तो म्हणतो, 'सांग कसा आहेस?' अश्रूंना थोपवण्याची कसरत करताना तुमची कोण त्रेधातिरपीट उडते...'सॉरी दोस्त' तुम्ही कसेबसे पुटपुटता. पण शब्द उमटतच नाहीत...

No comments: